खरेच बियाणे वांझ होते … ?

खरेच बियाणे वांझ होते … ?
“भुईला दिली ओल नाही ढगाने
कशी अंकुरावीत आता बियाणे?”
               बीजाची इच्छा आहे अंकुरण्याची, कोंब फ़ुटून वृक्ष बनण्याची,इतर वृक्षाप्रमाणे उंच-उंच वाढून गगनाशी स्पर्धा करण्याची…पण अंकुरण्यासाठी भुईत ओलावा असावा ना? बिना ओलाव्याने अंकुरायचे तरी कसे? अंकुरायला पाणीच हवे, कोणाचा कोरडा सल्ला किंवा अगम्य आशावाद किंवा प्रचंड मनोबळ असून-नसून उपयोग तो काय? ओलावा मिळाला तरच इच्छाशक्ती,आशावाद,मनोबळ उपयोगाचे. नाही तर शुन्य उपयोगिता.
              भुईला पण वाटते की त्या बीजाचा जन्म व्हावा. मातृत्वाची प्रेरणा काय असते,हे त्या मातेलाच कळे. पण ती तरी काय करणार बिचारी? ओलाव्यासाठी ती पुर्णत: मेघावर अवलंबून. मेघाकडून तिला पाण्याचे थेंबच हवे. कोरडे गर्जन नकोच. कोरड्या गर्जनाचा आवाज फ़ार मोठा. अशा गर्जनांमुळे गर्जना केल्याचा मेघाला आनंद मिळेलही कदाचित. पण अशा गर्जनांचा भुईने आणि बीजाने उपयोग तरी काय करून घ्यावा?
             बीजाला उगवता आले नाही कारण मातीत ओलावा नव्हता. आणि मातीत ओलावा तयार होण्यात न होण्यात बीजाचा दोष तो काय?
            पाऊस पाडला नाही हा दोष मेघांचा. दोष मात्र मढला जातो बीजाच्या माथ्यावर.
मेघांना दोषी ठरविण्यासाठी लागणारी हिंमत ज्यांच्याकडे नाही ते चक्क बियाणेच वांझ होते असा शेरा मारून मोकळे होतात.
गंगाधर मुटे
………………………………………………………………..