महिमा कशाचा ?

महिमा कशाचा ? 

कृपया एक गणित सोडवा.
जर शामराव M.Sc, Ph.D , I.A.S असेल तर….

१) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शेतीत वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
२) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता व्यवसायात वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
३) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता रिक्षा चालविण्यात वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
४) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शासकिय नोकरीत वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
५) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता राजकारणात वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.

महिमा कशाचा ? पात्रतेचा की व्यवस्थेचा?

मी पात्रता आणि लायकीबद्दल एवढेच म्हणेन की ज्यांना व्यवस्थेपेक्षा पात्रताच महत्वाची आहे असे वाटते त्यांनी शेती करून आपली पात्रता/लायकी सिद्ध करून दाखवावे. स्वत:चा अनुभव सांगावा,इतरांचा नाही.
वस्तुत: लायकीच्या बळावर या देशात अर्थप्राप्ती होते हे विधानच खोटे आहे.
येथे लायकी नव्हे तर व्यवस्थेला महत्व आहे भाऊसाहेब.

राष्ट्रीय उत्पन्न आणि शेती.

राष्ट्रीय उत्पन्न आणि शेती.

                         १९७० साली भारताच्या समग्र उत्पन्नाच्या ४६% टक्के उत्पन्न शेतीतून येत होते आणि ७०% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून होती. मात्र आज चित्र वेगळे आहे. आता भारताच्या समग्र उत्पन्नाच्या फक्त १६% टक्के उत्पन्न शेतीतून येते पण अजूनही ५५% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून आहे.
१९७० नंतर शेतीची उत्पादकता कमी झालेली नाही या उलट शेतीमधिल एकरी उत्पादन कैकपटींनी वाढले आहे,तरी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न ४६ % टक्क्यावरून चक्क १६ % एवढे खाली उतरलेले दिसते. याचे कारण स्पष्ट  आहे.
                      राष्ट्रीय उत्पन्न उत्पादनाच्या संख्यांकावर किंवा वजनावर नव्हे तर त्या उत्पादनाच्या मुल्यावर काढले जाते.
                     जर वजनाच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्न ठरवले गेले तर याक्षणी सुद्धा देशाच्या उत्पादनाच्या एकुन उत्पादनापैकी शेतीचे उत्पादन हे ९० टक्क्यांपेक्षा जास्त असणार हे उघड आहे.
परंतू येथे मुख्य गोम अशी की
                    औद्योगीक मालाच्या किंमती स्वातंत्र्योत्तर काळात भरमसाठ वाढत गेल्यात मात्र त्यातुलनेने शेतमालाच्या किंमती वाढल्या नाहीत त्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा हिस्सा कमी दिसतो.
त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादकतेशी निगडीत नसून त्या उत्पादनाच्या बाजारभावावर अवलंबून आहे हे आपण लक्षात घेतले पाहीजे

बागायती कापसाचा उत्पादन खर्च

बागायती कापसाचा उत्पादन खर्च
प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप :१५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ६००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
———————————————–
एकूण भांडवली खर्च : ४६००००=००
———————————————–
अ) चालू खर्च..
शेण खत : २५००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १५००० रु.
किटकनाशके : १६००० रु.
संप्रेरके : ३००० रु.
सुक्ष्मखते : १२००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : २४००० रु.
वाहतूक खर्च : ६००० रु.
ओलीत मजुरी : १२००० रु.
वीज बिल : ४००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
———————————————-
एकूण खर्च (अ) : १,४८ ,००० = ००
———————————————-
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४६०००=००
…. चालु गुंतवणुकिवरील व्याज : १००००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४६०००=००
——————————————————————————–
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २५०००० = ००
——————————————————————————–
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ६० quintal.
इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत १८०००० = ००
———————————————————————————
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २,५०,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत १,८०,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,७०,००० = ००
———————————————————————————
.
.
…….. वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,आणि १ विहिर १० एकराचे ओलित होवु शकते असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.

जिरायती कापसाचा उत्पादन खर्च

जिरायती कापसाचा उत्पादन खर्च.
प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप : ००००=००
३) शेती औजारे : २००००=००
४) बैल जोडी : ४००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
———————————————–
एकूण भांडवली खर्च : २,८०,०००=००
———————————————–
अ) चालू खर्च..
शेण खत :००००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १०००० रु.
किटकनाशके : १०००० रु.
संप्रेरके : ०००० रु.
सुक्ष्मखते : ०००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : १२००० रु.
वाहतूक खर्च : ३००० रु.
ओलीत मजुरी : ०००० रु.
वीज बिल : ०००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
———————————————-
एकूण खर्च (अ) : ७६,००० = ००
———————————————-
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : २८,०००=००
…. चालु गुंतवणुकिवरील व्याज : ५,०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : २८,०००=००
——————————————————————————–
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क         १,३७,००० = ००
——————————————————————————–
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ३ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ३० क्विंटल.
इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत ९०,००० = ००
———————————————————————————
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क …….१,३७,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत…..०,९०,००० = ००
ह) शुद्ध तोटा……………………………. ०,४७,००० = ००
———————————————————————————
.
.
…….. वरिलप्रमाणे मी काढलेला जिरायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत
                                            गंगाधर मुटे
—————————————————–
=========================================

खरेच बियाणे वांझ होते … ?

खरेच बियाणे वांझ होते … ?
“भुईला दिली ओल नाही ढगाने
कशी अंकुरावीत आता बियाणे?”
               बीजाची इच्छा आहे अंकुरण्याची, कोंब फ़ुटून वृक्ष बनण्याची,इतर वृक्षाप्रमाणे उंच-उंच वाढून गगनाशी स्पर्धा करण्याची…पण अंकुरण्यासाठी भुईत ओलावा असावा ना? बिना ओलाव्याने अंकुरायचे तरी कसे? अंकुरायला पाणीच हवे, कोणाचा कोरडा सल्ला किंवा अगम्य आशावाद किंवा प्रचंड मनोबळ असून-नसून उपयोग तो काय? ओलावा मिळाला तरच इच्छाशक्ती,आशावाद,मनोबळ उपयोगाचे. नाही तर शुन्य उपयोगिता.
              भुईला पण वाटते की त्या बीजाचा जन्म व्हावा. मातृत्वाची प्रेरणा काय असते,हे त्या मातेलाच कळे. पण ती तरी काय करणार बिचारी? ओलाव्यासाठी ती पुर्णत: मेघावर अवलंबून. मेघाकडून तिला पाण्याचे थेंबच हवे. कोरडे गर्जन नकोच. कोरड्या गर्जनाचा आवाज फ़ार मोठा. अशा गर्जनांमुळे गर्जना केल्याचा मेघाला आनंद मिळेलही कदाचित. पण अशा गर्जनांचा भुईने आणि बीजाने उपयोग तरी काय करून घ्यावा?
             बीजाला उगवता आले नाही कारण मातीत ओलावा नव्हता. आणि मातीत ओलावा तयार होण्यात न होण्यात बीजाचा दोष तो काय?
            पाऊस पाडला नाही हा दोष मेघांचा. दोष मात्र मढला जातो बीजाच्या माथ्यावर.
मेघांना दोषी ठरविण्यासाठी लागणारी हिंमत ज्यांच्याकडे नाही ते चक्क बियाणेच वांझ होते असा शेरा मारून मोकळे होतात.
गंगाधर मुटे
………………………………………………………………..

शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे

शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे

                   आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी मानसोपचार शिबिरे आयोजित करावी, असा वारंवार सल्ला दिला जातो त्या अनुषंगाने खालील बाबींचा विचारवंताकडून खुलासा होणे आवश्यक आहे.

१) जेंव्हा जेंव्हा शेतकरी आत्महत्येचा विषय निघतो तेंव्हा तेंव्हा शेतकरी मनोदुर्बलता किंवा मनोरुग्णतेमुळे आत्महत्या करतो असेच निदान केले जाते. आणि त्याच अनुषंगाने उपाययोजना सुचविल्या जातात. सहाजीकच, निदान जर चुकीचे असेल तर सुचविलेले उपाय योग्य कसे असणार? (वाचा – शेतकरी आत्महत्यावर तज्ज्ञांची मुक्ताफळे – )

२) आर्ट ऑफ लिविंग किंवा मानसोपचार शिबिरे आयोजित करायला हरकत नाही पण शेतकर्‍यांचे मनोबळ वाढावे यासाठी काय सांगणार? प्रबोधनाचे स्वरूप काय असणार?
उदा. शेतकरी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या करत असेल तर त्याचे मनोबळ वाढविण्यासाठी

अ) कर्ज परत करण्यासाठी चोरी करा, दरोडे घाला आणि पैसे मिळवून कर्ज परत करा असे सांगणार? (शेतीच्या उत्पन्नातून/बचतीतून त्याला कर्ज फ़ेड करता आली नाही हे गृहीत धरावेच लागेल.)

आ) मरण पत्करण्यापेक्षा कर्ज बुडवायला शिकण्याचा सल्ला देणार?

इ) आर्थीक हलाखीमुळे मुलीचे लग्न करता येत नसेल तर टेंशन घेऊ नकोस, ती बिनालग्नाची राहीली तरी चालेल पण तू जगलाच पाहीजे असे सांगणार?

ई) सावकाराने कर्जापायी भरचौकात अपमान केला तरी तू मनाला लावून घेऊ नकोस, संवेदनाक्षम, हळवेपणाने जगण्यापेक्षा कोडगेपणाने वाग असा सल्ला देणार?

            मानसोपचार शिबिरे घेणार म्हणजे त्याला काय समजावणार याचा उलगडा व्हायला हवा.
रोगाचे निदानच चुकीचे घेवून एखादा मानसोपचारतज्ज्ञ उपचार करणार असेल तर अपेक्षित परीणाम कसा साधला जाईल?
हे प्रश्न अनुत्तरीत राहातात.
………………………………………………………
या अनुषंगाने झालेली एक प्रश्न-उत्तरांची देवानघेवान.


शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर पुष्कळ चर्वितचर्वण  झाले आहे.
(आणि त्या सर्वांच्या मते शेतकरी मुर्ख, मनोरुग्न व अज्ञानी आहे.)


 कित्येकदा तर मूळ विषयाचे गांभीर्य दडपून टाकून, केवळ सरकारवर तोफा डागण्यासाठी हा विषय ‘हायजॅक’ केला गेला आहे.
(हे ‘हायजॅक’ करणारे मात्र नक्कीच मनोरुग्न असणार. पाठवा त्यांना मेंटल हॉस्पीटल मध्ये. माझे सक्रिय समर्थन.)


मुंबईतल्या किंवा कुठल्याही झोपडपट्टीमधले, उकिरड्यातले अन्न वेचून खाणारे, रेल्वे रुळांवर शौचास जावे लागत असलेले, दिवसोंदिवस आंघोळ करू न शकणारे लोक आत्महत्या का करीत नाहीत? 
(ते सात पिढ्यांत फेडता येणार नाही एवढे कर्जबाजारी नाहीत म्हणून.)


त्यांच्यामध्ये जगण्याची कोणती प्रेरणा असते?
(सर्व सजीवांमध्ये जगण्याची  प्रेरणा सारखीच असते.)


 किंवा, उलटपक्षी, कॅट सारख्या परीक्षांतील अथवा कुठल्याही परीक्षेतील अपयशाला घाबरणारे, आय. आय. टी सारख्या नामवंत शिक्षणसंस्थांतून शिकणारे लोक आत्महत्या का करतात? त्यांच्यामध्ये कोणती प्रेरणा कमी पडते? महत्त्वाच्या परीक्षांच्या निकालांच्या आगेमागे आत्महत्यांची लाट का येते?  रोज रात्री नवर्‍याच्या लाथाबुक्क्यांचा मार खाऊन, प्रसंगी डाग, चटके सोसून पुन्हा सकाळी निमूटपणे सर्व अपमान व सर्वांसमोर झालेली शोभा विसरून(सूडाची भावना न ठेवता) त्याच्यासाठी स्वयंपाक बनवणारी स्त्री कोणत्या अंतःप्रेरणेने जगत असते? त्यातल्या काही आत्महत्या करतातही, पण एकंदर अत्याचाराच्या प्रमाणात त्या नगण्य असतात.
(आत्महत्येस एवढेच कारण पुरेसे नाही.)


शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा देशातल्या एकूण आत्महत्यांमधला एक छोटा भाग आहे.
(किती शेतकर्‍यांनी पुन्हा आत्महत्या कराव्यात म्हणजे आंकडा शोभून दिसेल ????????.
सबंध देशात फक्त एका शेतकर्‍याने जरी आत्महत्या केली तरी एखाद्याला ते लाजीरवाने वाटेल. याउलट आत्महत्या करता करता एखादी पिढी जरी उध्वस्त झाली तरी एखाद्याला त्याचे काहीच वाटणार नाही. हे समिकरण शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या संख्येवर नव्हे तर त्या “एखाद्याची” मानसिक रचना/ठेवन कशी आहे यावर अवलंबून आहे. )


 त्यातूनही, सर्वच कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतात का?  
(“सर्वच कर्जबाजारी शेतकर्‍यांनी आता सामुहीक आत्महत्या करून  तसे सिद्ध करून दाखवावे, तसे न केल्यास आत्महत्या करणार्‍याला आम्ही मनोरूग्न म्हणत राहू, इतर कुठल्याही कसोट्यांवर पडताळा करण्याची गरज नाही” असा याचा अर्थ घ्यायचा काय? )


जर ह्याचे उत्तर ‘नाही’ असे असेल, तर आत्महत्यांमागे मनोदुर्बलता हे कारण असण्याची शक्यता वाढते.


(मग सरकार झोपी गेले काय? अशा मनोरूग्न शेतकर्‍यांची तातडीने राज्यवार यादी बनवा आणि प्रसिद्दीला द्या. म्हणजे अशा मनोरूग्न शेतकर्‍यापासून इतर शेतकरी बांधव सुरक्षीत अंतर ठेवून चालतील.)


गंगाधर मुटे
………………………………………………………………..

सहज करता येण्याजोगे शेती-उद्योग

सहज करता येण्याजोगे शेती-उद्योग.

                 बदलत्या काळानुसार शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लागला आहे. नत्र,स्फ़ुरद, पालाश या मुख्य खतांसोबतच सुक्ष्मखतांचा (Micro nutrient fertilizers) वापर वाढला आहे. पैकी नत्र,स्फ़ुरद,पालाश या मुख्य खतांची निर्मीतीसाठी प्रचंड गुंतवणुकीचे कारखाने लागतात.

परंतू सुक्ष्मखतांची (Micro nutrient fertilizers) निर्मीती किंवा प्रक्रिया-पॆकिंग करून विपनन करणे हा उद्योग/व्यवसाय म्हणुन अत्यंत चांगला पर्याय ठरू शकतो.
या अनुषंगाने इच्छूकांना मदत व्हावी या उद्देशाने येथे काही कृषीसंबधित करता येण्याजोग्या उद्योगांची एक यादी बनविण्याचा प्रयत्न करित आहे.


१) सुक्ष्मखते (Micro nutrient fertilizers)
पिकांच्या जोमदार वाढीसाठी १६ मुलद्रव्यांची (elements) आवश्यकता असते. त्यापैकी Fe, Zn, Mn, Cu, B, Mo, Cl हे प्रमुख मुलघटक असुन यांच्या एकापेक्षा अधिक मुलघटकांच्या योग्य त्या प्रमाणात मिश्रणाला सुक्ष्मखते म्हणतात. सध्या या सुक्ष्मखंतांना प्रचंड मागणी आहे.
मुलद्रव्यांची (elements) नांवे खालील प्रमाणे.
1) Copper sulphate (CuSO4.5H2O)
2) Zinc sulphate (ZnSO4.7H2O)
3) Borax or Sod.Borate (Na2B4O7.10 H2O)
4) Manganese Sulphate (MnSO4.4H2O)
5) Ammonium Molybdate ( (NH4)6Mo7O24.4H2O)
6) Ferrous sulphate (FeSO4.7H2O)
7) Magnesium sulfate (or magnesium sulphate)
………………………………………………………………………
२) जैविक खते (Bio-fertilizers)
A. Nitrogen fixers
Symbiotic: – Rhizobium, inoculants for legumes.
Non-symbiotic: – For cereals, millets, and vegetables.
a) Bacteria:-
i). Aerobic:-Azatobacter, Azomonas, Azospirillum.
ii) Anaerobic:- Closteridium, chlorobium
iii) Facultative anaerobes- Bacillus, Eisherichia
b) Blue green algae- Anabaena, Anabaenopsis, Nostoe
A. Phosphate solubilizing micro-organisms.
B. Cellulolytic and lignolytic micro-organisms.
C. Sulphur dissolving bacteria.
D. Azolla.
………………………………………………………………………….
३) संप्रेरके – फ़वारणीच्या माध्यमातुन वापर केला जातो.
पिकांची कायीक वाढ, फ़ळांची गुणवत्तासुधारणा, पिकांचा कालावधी
कमि-जास्त करणे वा तत्सम कारणासाठी संप्रेरके वापरली जातात.
सध्या वापरात असलेली काही मुख्य संप्रेरके.
१) आमिनो अ‍ॅसिड – Amino Acid.
२) जिबरेलिक अ‍ॅसिड – Gibberellic acid (also called Gibberellin A3, GA, and (GA3)
३) नॆपथ्यालिक अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड – NAA
४) ह्युमिक ऎसिड – Humic acid – Fulvic acid organic plant food and root growth promoters
……………………………………………………………………………
१) या उद्योगांसाठी जिल्हा उद्योग केंद्र,खादी-ग्रामोद्योग वा इतर शासकिय विभागांकडून बिजभांडवल स्वरूपात अर्थसाहाय्य होऊ शकते.
२) वर उल्लेखिलेले बहुतांश उद्योग २५ लाखाचे आंत असल्याने पंतप्रधान रोजगार योजनेंतर्गत सबसिडी मिळण्यास पात्र आहेत.
वरिल सर्व उत्पादनांना चांगली मागणी असून मालाची गुणवत्ता व मार्केटिंग
कौशल्य या दोन बाबींच्या आधारावर सहज यशप्राप्ती होऊ शकते.
.शुभेच्छासह.
.
गंगाधर मुटे.

———————————————————————————————
div dir=”ltr” style=”text-align: left;” trbidi=”on”>

०३-०७-२०१३

टीप : शेतीविषयक सल्ला विचारणारे अनेक प्रश्न या लेखावर वाचकांकडून प्रतिसादामार्फ़त उपस्थित केले जातात. त्या सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी माझ्याकडे काहीही यंत्रणा नसल्याने मी कुणालाच फ़ारशी व्यक्तिगत मदत करू शकत नाही.

यावर पर्याय म्हणून मी http://www.baliraja.com/ या साईटवर काही पर्यायी व्यवस्था उभारायचा प्रयत्न केला परंतू अजूनपर्यंत तरी मला यश आलेले नाही.
त्यामुळे सल्ला अथवा मदतीची अपेक्षा असलेले प्रश्न प्रतिसादातून विचारले जावू नयेत. ही विनंती.

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन

………………………………………………………………………..
आधी काय निर्माण झाले असावे.?
कोंबडी की अंडी ?
अनेकदा अशा तर्‍हेच्या प्रश्नामध्ये आपण पुरते गुरफटुन जात असतो.
उत्तर मिळविण्याच्या प्रयत्नात उत्तर मिळण्याऐवजी नव्याने नवेनवे प्रश्नच निर्माण होत जातात.
गुंता सुटण्याऐवजी गुंतागुंत वाढतच जाते.वैताग येतो.आणि जाऊ दे, काय करायचे आपल्याला असे म्हणुन विषय सोडुन देतो.
………….
प्रश्नांची उकल करणे खरेच कठीन असते ?.
ज्याला उत्तर नाही असा प्रश्न असु शकतो ?
‘आधी कोंबडी की आधी अंडी’ या प्रश्नाचेच बघा.
विचार करता करता थोडा शास्त्रिय आधार घेतला की निर्विवाद आणि बिनतोड उत्तर मिळुन जाते.कळुन चुकते की पृथ्वीतलावर आधी अंडीचे आगमन झाले नंतर अंडीपासुन कोंबडी जन्माला आली. गुंतागुंत दुर होते आणि लक्षात येते की महाकठीन वाटणारे उत्तर एवढे सोपे होते?
…………………….
आज हा विषय चघळण्याचे कारण ?
२६ जानेवारी – गणराज्य-प्रजासत्ताक दिन येतोय.
या निमित्ताने देशभर चर्चेला पाय फुटणार. स्वातंत्र्योत्तर काळात
‘काय मिळवले काय गमविले’
‘देश जगात महाशक्ती म्हणुन उदयास येणार की नाही’.
‘देशाला प्रगतीपथावर नेण्यास कोणी किती योगदान दिल्रे’.
त्यासोबतच दबक्या आवाजात का होईना पण हाही एक विषय चर्चिला जाणार.
देशाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण?
राजा की प्रजा ? नेते मंडळी की जनता जनार्दन ?
अर्थातच कोंबडी की अंडी ?
नुसतीच चर्चा…… उत्तर नसलेली.
उत्तर शोधायचा प्रामाणिक प्रयत्न न झालेली.
२७ तारिख उजाडली की आमची नित्याची दिनचर्या सुरु.
हे असे रहाटगाडगे………..पुन्हा त्या चर्चेला एक वर्षाची विश्रांती…..!!
याला म्हणायचे प्रजासत्ताक…..!!
जोरसे बोलो….
प्रजासत्ताक दिन चिरायु होवो….!!!!!!!!!!!!!!!
..
गंगाधर मुटे

१२.०१.२०१० 

शेतकरी पात्रता निकष.

  शेतकरी पात्रता निकष.
एक प्रश्न :- शिरीष(मायबोलीवर) यांनी “एखाद्या माणसानं कधीच शेती केली नसेल – आणि त्याला शेती करायची असेल तर कुठले मुद्दे विचारात घ्यावेत? म्हणजे, आर्थिक, मानसिक, शारिरीक आणि कायदेशीर सर्व बाबींबद्दल तुमचा अनुभव/मते सांगा – प्लीज! “असा प्रश्न विचारला आहे. त्याबद्दल थोडेसे…..
……………………………………………………………..
              या प्रश्नाचे उत्तर फारच अवघड आहे.असा प्रश्न मला आजवर कोणी विचारलाच नाही.”इधरसे बाहर निकलनेका रस्ता है,अंदर आनेके लिये रस्ता तो हैही नही”.
शेती सोडून जे अन्यत्र गेले त्यांच्या आयुष्याचे सोने झाले याउलट जे बाहेरुन शेतीत आले ते गेले,कामातुनच गेले,मातीमोल झाले.
               हे जर मला माहीत असेल तर मी काय माहीती द्यावी? आम्ही कवी माणसं.कविता करतांना पतंगाला सहज अग्निज्योतीवर उड्डान घ्यायला सांगतो आणि प्रेमाच्या आहुतीची महती गातगात कविता पुर्ण करतो.पण जित्याजागत्या जिवाला शेती करायला लावणे म्हणजे खोल डोहात बुडण्यासाठी आमंत्रीत करण्यासारखे आहे. तरीपण मी उत्तर द्यायचा माझ्यापरी प्रयत्न करणार आहे.
.
या प्रश्नाचे दोन विभाग पडतात.शेती कशासाठी करायची ?

अ) हौसेखातर शेती. (उपजिविकेसाठी अन्य सोर्स आहेत अशांसाठी.)
हौसेखातर शेती करायची असेल तर कशाचीच अडचन नाही.घरात दोन पिढ्या जगतील ऐवढी संपत्ती असेल,पुढारीगिरी करुन माया जमविता येत असेल किंवा घरातले कोणी सरकारी नोकरीत असुन पगाराव्यतिरिक्त माया जमविण्याचे अंगी कौशल्यगुण असेल तर त्यांच्यासाठी काळ्या पैशाला पाढर्‍यात रुपांतरीत करण्यासाठी शेती एक वरदानच ठरत आली आहे.
ब) उपजिविकेसाठी शेती.
उदरभरनासाठी शेती ( उदरभरन हाच शब्द योग्य.लाईफ बनविने,करिअर करणे, जॉब करणे सारखे शब्द सुद्धा येथे फालतु आहेत.) करायची असेल तर मग गंभीरपणे विचार करावा लागेल.त्यासाठी कायकाय हवे आणि कायकाय नको अशा दोन याद्या कराव्या लागतील.
१] प्रथम आर्थीक खर्चाची यादी करू.अंदाजे किंमतीसह.

१) १० एकर शेतजमीन………२०,००,०००=००
२) बांधबंदिस्ती : ………………..२०,०००=००
२) विहीर पंप :…………………१,५०,०००=००
३) शेती औजारे :………………. ३०,०००=००
४) बैल जोडी :………………….. ६०,०००=००
५) बैलांचा गोठा :…………… १,००,०००=००
६) साठवणूक शेड :…………..१,००,०००=००
———————————————–
एकूण अंदाजे भांडवली खर्च : २४,६०,०००=००
———————————————–

सर्वसाधारणपणे अंदाजे २५,००,०००=०० एवढी भांडवली गुंतवणुक करावी लागेल.

शारिरीक गरजा :

१) त्वचा जाडी भरडी असावी.सहजासहजी काटा रुतायला नको.
२) रंग घप्प असावा.शक्यतो डार्क ब्लॅक.
३) गोरा,निमगोरा,गव्हाळी वगैरे रंग इकडे घेऊन येऊ नये.चार-सहा महिण्यातच रंग बदलण्याची हमखास शक्यता.त्यासाठी एक उन्हाळा पुरेसा आहे.
४) पायांना चपलेची आदत नसावी.चिखलात चप्पल चालत नाही.
५) शरीरात रक्त जास्त नको,जेमतेम असावे कारण काटा रुतला तर भळाभळा वाहायला नको.
६) हाडे कणखर आणि दणकट असावी.
७) शरीरात चपळता असावी.बैल पळाल्यास धावुन पकडता येणे शक्य व्हावे.
८) ५०-६० किलो वजन २-४ किलोमीटर वाहुन नेण्याची क्षमता असावी.

मानसिक गरजा :-

१) बिपीचा आजार नकोच.नाहीतर शेतीत पहिल्याच वर्षी जर घाटा-तोटा आला तर लगेच ” रघुपती राघव राजाराम” हे गित घरासामोर वाजंत्री वाजविण्याची शक्यता……राम नाम सत्य है…
२) हाजीहाजी करण्याची सवय हवी.कारण इथे पुढार्‍यावाचुन बरीच कामे अडतात.आर्थिक पाठबळ नसल्याने जागोजागी हाजीहाजी केल्यावाचुन गत्यंतर नसते.
३) मिनतवारी करणे हा अंगिभुत गुण असावा कारण प्रत्येक ठीकाणी उधारीपाधारी शिवाय इलाज नसतो.
४) आत्मसन्मान वगैरे वगैरे अजिबात नको.हमालानेही अरे-कारे,अबे-काबे म्हणुन दोन शिवा हासडल्या तर वैषम्य वाटायला नको.शेतकर्‍यासोबतची सर्वांची बोलीशैली ठरली आहे.७० वर्षाच्या शेतकर्‍याला १२ वर्षाचा व्यापारी पोरगा सुद्धा याच भाषेत बोलत असतो.
५) मुलाबाळांना उच्चशिक्षण द्यायच्या महत्वाकांक्षा नकोत.नाहीतर अपेक्षाभंग व्हायचा.
६) चांगले जिवनमान जगण्याची हौस नसावी.अनेक पिढ्या उलटूनही तसे शक्य होत नाही.
७) थोडाफार मुजोरपणा हवा.
सावकार – बँका कर्जवसुली मागण्यास आल्या तर – पुढच्या वर्षी देतो, होय देतोना, पळुन गेलो काय, होईन तवा देईन, नाही देत जा होईनते करुन घे. अशी किंवा तत्सम उत्तरे देता आली पाहीजेत.तरच चार वर्षे पुढे जगता येईल.
८) मनाचा हळवेपणा अजिबात नको. जर का तुम्ही संवेदनाक्षम-हळव्या मनाचे असलात तर चार लोकात झालेली फटफजिती सहन न झाल्याने गळफास लावुन घ्यायचे.म्हणुन मुजोरपणा हवा हळवेपण अजिबात नकोच.
९) पंखा,कुलर,फ्रीज,टिव्ही वगैरेची आवड नको. दिवसभर शेतात काम झाले की आलेला शिन-थकवा एवढा भारी की खाटेवर पडल्याबरोबर ढाराढूर झोप लागत असते.
१०) विचार करण्याची प्रवृत्ती नको नाहीतर चिंतारोग व्हायची भिती.

कायदेशिर गरजा:-

कायदेशिर ज्ञान नसले तरी चालते. खिशात पैसे असेल तर हवा तेवढा सल्ला वकिल मंडळीकडून घेता येतो.

माझ्या मते जर कोणाला नव्याने शेती करायची (गावरानी भाषेत जिरवुन घ्यायची) हौस असेल तर त्यांनी एवढा विचार नक्किच करायला हवा.
देशाच्या पोशिंद्याची ही चार प्रश्नांची कहानी अठरा उत्तरी सुफळ संपुर्णम…..!
पोशिंद्याचा विजय असो….!!

. गंगाधर मुटे
==================================
वांगे अमर रहे या लेखावर आज पंकज यांची एक प्रतिक्रिया आली ती खालीलप्रमाणे…
……………………………………………………….
बटाटा अमर रहे ! …….
मुटे साहेब आज प्रामाणिक पणे वाटते की शेतीला आयकर नसावा…
काल ७०१० रु. ला आठ क्विंटल बटाटा मोडून आलोय.
संपूर्ण उत्पादन खर्च १०,६०० रु आला होता.
१०,६०० – ७०१० = ३५९० येवढा तोटा झाला.

पण कमी तोटा झाल्याबद्दल वडील थोडेसे समाधानी होते. इतर लोकांचा तोटा ऐकुन फार वाइट वाटले…
अर्थात एक एकर बटाटा निदान १५ क्विंटल निघेल आणि दर सरासरी १२ रु किलो मिळेल अशी अपेक्षा होती (म्हणजे साधारण १८००० रु). बटाटा पुण्याला आणणार होतो. त्यामुळे वडिल गावाकडून टेंपो पाठवून देणार होते आणि मी येथे व्यवहार करणार होतो. पण प्रत्येक्षात उत्पादन कमी मिळाल्यामुळे माल तिकडेच विकुन टाकला…
……………………………………………………….

गुणसूत्रांची अदलाबदल आणि जेनेटिकली मॉडिफिकेशन

गुणसूत्रांची अदलाबदल आणि जेनेटिकली मॉडिफिकेशन



                       भारतीय बाजारपेठेत “वांग्या”च्या गुणसूत्रांत अनैसर्गिक बदल केलेली वांगी विक्री करण्याचा परवाना द्यावा अथवा नाही याबद्दल यानिमित्ताने बराच विचारविनिमय,चर्चा आणि उहापोह झाला आणि अशा परवान्यास केंद्रिय शासनाने तात्पुरती स्थगिती दिल्याने आता ही चर्चा बराच काळ चालेल.
अशा तर्‍हेचा परवाना द्यावा किंवा देवू नये याविषयी नेहमीप्रमाणेच मुख्यत्वे ३ गट पडलेत.
१) टोकाचे समर्थन करणारे
२) टोकाचा विरोध करणारे.
३) जो काही निर्णय घ्यायचा पुरेपुर विचारांतीच घ्यावा,निष्कारण घाई करू नये या मताचे.
ही चर्चा पुढे चालविण्यापुर्वी मी असा परवाना देण्याचा समर्थक आहे हे मान्य करू इच्छीतो.
बी टी वांग्याचा मी समर्थक आहे,त्यामागील पार्श्वभूमी.
१) मनुष्यप्राण्याचा विकास केवळ नवनवे संशोधन व नवनवी साधन निर्मीती यातूनच होत असते.
२) काळाच्या ओघात निसर्गतः होणारी उत्क्रांती,बदल कोणीच रोखू शकत नाही.ते रोखताही येत नाही,किंबहूना अशा बदलानेच मानसाचे जीवन अधिक समृद्ध आणि सुखकारक झाले आहे.
३) तसेच मानवनिर्मित संशोधने फार काळ रोखून धरता येणार नाही.अशा संशोधनांना आममार्गाने प्रवेश नाकारला तर ते वाम मार्गाने येतील.
४) या संशोधित जातीचा वापर करणे ऐच्छिक आहे.
                              परंतू अशा तर्‍हेचा परवाना देण्याअगोदर आणि अशी संशोधने अंमलात आणतांना ती मनुष्यप्राण्यासाठी “जिवघेणी” ठरणार नाही, याची काळजी घेणे फारच महत्वाचे आहे,असे मला वाटते.
त्या साठी काही मुलभुत बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
                            गुणसूत्रांची अदलाबदल आणि जेनेटिकली मॉडिफिकेशन-हे शास्त्रीय किचकट शब्द बाजुला ठेवून अगदी सर्वांना सहज समजेल अशी काही उदाहरणे तपासू.
१) बासमती भातात एचएमटी भाताची भेसळ.किंवा म्हशीच्या दुधात गायीच्या दुधाची भेसळ.
२) बासमती भातात खडे,बारीक दगडांची भेसळ.किंवा म्हशीच्या दुधात पाण्याची भेसळ.
३) बासमती भातात रासायनिक खतांची भेसळ.किंवा म्हशीच्या दुधात चुना किंवा रसायनिक द्रवाची भेसळ.
या झाल्या भेसळीच्या तीन पद्धती.
पहिल्या प्रकारची भेसळ वाईट पण माफीयोग्य.
दुसर्‍या प्रकारची भेसळ जास्त वाईट आणि ग्राहकाला पिडादायक.
पण तिसर्‍या प्रकारची भेसळ ही चक्क जिवघेणीच.
गुणसूत्रांची अदलाबदल आणि जेनेटिकली मॉडिफिकेशन- या बाबतीतही तेच म्हणता येईल.
१) समवर्गीय वनस्पतीच्या जनुकांची अदलाबदल-फायदेशीर ठरली.(शुन्य नुकसान)
२) वनस्पतीवर रसायन प्रयोग/उपयोग – फायदेशीर पण मानवी जीवितास थोडे अपायकारक
३) मातीमधले जनुक काढून कृत्रीमरित्या वनस्पतीमध्ये जनुकीय बदल घडवून आणणे – फायदा दिसतो पण             

         मानवी जीवनावर नेमके काय बरेवाईट परिणाम होतील ?
         याचे नक्की उत्तर कोणाकडेच नाही.
        तेंव्हा या विषयावर पुरेपूर विचार होवूनच निर्णय घेतले पाहीजेत.
        तुम्ही-आम्ही किती काळ जगणार..? माहीत नाही.
        परंतू भूतलावर मनुष्यजातीला यापुढील हजारो वर्षे जगायचे आहे….. हेही लक्षात घेतले पाहीजे.
.
गंगाधर मुटे
………………………………………………………….
तळटीप.
विष निर्माण केले की त्याची पडताळणी उंदरावर केली जाते.
उंदराचा किती वेळात प्राण जातो त्यावरून त्या विषातिल विषाचे प्रमाण ठरविले जाते.
आता बीटी जनुकाचे मानवी जिवनावर काय परिणाम होतात ते तपासायचे झाले तर जगात भारताव्यतिरिक्त दुसरा कोणता देश तयार होईल हो “उंदिर” बनायला..?
………………………………………………………….