शेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्‍यांचे रेलरोको

शेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्‍यांचे रेलरोको

                  दि. १० नोव्हेंबर २०१० रोजी शेतकरी सघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शेतकरी संघटनेचा संतनगरी शेगावात स्व. गजाननदादा पाटील मार्केट यार्डमध्ये शेतकरी महामेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवी देवांग हे होते. मंचावर माजी आमदार वामनराव चटप, सरोजताई काशीकर, शैलाताई देशपांडे, दिनेश शर्मा, महिला आघाडीच्या जयश्री पाटील, हरीयाणाचे गुणीप्रकाश, कर्नाटकचे हेमंतकुमार, दिलीप भोयर, अनंत उमरीकर, सम्राट डोंगरदिवे, संजय कोले, अनिल घनवट, जिल्हाध्यक्ष नामदेवराव जाधव, रमेशसिंह राजपूत आदी उपस्थित होते. 
                मेळाव्यात प्रख्यात कवी इंद्रजीत भालेराव यांच्या ‘माझा बाप शेतकरी’ या कवितांची सीडी प्रकाशित करण्यात आली तसेच शरद जोशी यांच्या ‘भारतासाठी’ व ‘पोशिद्याची लोकशाही’ या दोन पुस्तकाचे तर कवी गंगाधर मुटे यांच्या ‘रानमेवा’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन शरद जोशींच्या हस्ते करण्यात आले. रावेरी येथे सिता मंदिराचे बांधकाम करणाऱ्या रमेश पाटील यांचा यावेळी शरद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शरद जोशी यांना यावेळी कृतज्ञता निधी वामनराव चटप, कैलास पवार, रवि देवांग यांच्या हस्ते देण्यात आला.


शरद जोशी यांना कवितेचे सन्मानपत्र 


             शरद जोशी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांना इंद्रजीत भालेराव यांच्या कवितेच्या ओळी चांदीच्या तबकावर कोरून ते मानपत्र प्रदान करण्यात आले. शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होई पर्यंत कुठलाही सत्कार स्वीकारणार नाही अशी घोषणा केली होती मात्र कार्यकर्त्यांच्या भावना जाणून मी हे सन्मानपत्र स्वीकारले असे जोशी यांनी स्पष्ट केले. मी शंभर वर्ष जगावे असे वाटत असेल तर शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होण्याची लढाई जोमाने लढा माझ्यासाठी हीच उर्जा ठरेल असे भावनिक उदगार त्यांनी काढले. हे सन्मानपत्र जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ अप्पा बुरघाटे, बापुमामा थिटे, द्वारकाबाई पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
शरद जोशींनी आपल्या भाषणात धान आणि कापसाची निर्यात खुली करा, उसाला पहिली उचल २२०० रू द्या, शेतातील तोडलेली वीज तातडीने जोडून द्या इत्यादी मागण्यांच्या समर्थनार्थ रेल्वेरोको आंदोलन करण्याचे आदेश देताच उपस्थित शेतकरी रेल्वे स्थानकाकडे धावले आणि सुमारे तीन तास रेल्वे अडवून धरली. शेतकरी रेल्वे रूळावर ठीय्या मांडून बसले.
*

अमरावती-भुसावळ पॅसेंजर अडवितांना ठीय्या देऊन बसलेले शेतकरी.

…………….

राज्यपालांना सादर करावयाच्या मागण्यांचा मसुदा तयार करताना रविभाऊ देवांग व अ‍ॅड वामनराव चटप.


……………

…………..
शेगाव रेल्वेरोको आंदोलन
………..
राज्यपालांमार्फ़त त्यांचे अप्पर सचिव दे.च.खाडे व स्विय सहाय्यक यांनी आंदोलनकर्त्या नेत्यांशी चर्चा केली. शेतकरी संघटनेच्या मागण्यांबाबत पुढील आठवड्यात शेतकरी संघटनेच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावले जाईल असे लेखी पत्र राज्यपालांमार्फ़त देण्यात आल्याने तीन तास चाललेले आंदोलन स्थगित करण्यात आले.
……………………

शेतकरी युवा मेळावा

shetkari sanghatana

Baliraja

शेतकरी युवा मेळावा

हिंगणघाट : दि. १५
“रात्रंदिवस काबाडकष्ट करूनही शेतकरी कायमच कर्जबाजारी का राहातो, त्याला सन्मानाचे जीवन का जगता येत नाही, याचा शेतकरी नवयुवकांनी शोध घेऊन उत्तर शोधावे” असे आवाहन शेतकरी संघटनेचे बळीराज्य विदर्भप्रदेश अध्यक्ष जगदिश बोंडे यांनी केले. स्थानिक शिवसुमन सभागृहात संपन्न झालेल्या शेतकरी युवक मेळाव्यात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, १९७२ साली एक क्विंटल कापसाच्या किंमतीत १० ग्रॅम सोने व्हायचे, त्यानंतर शेतीमालाच्या तुलनेत अन्य वस्तुचे भाव प्रचंड वाढले. त्यामुळे कापूस शेतीच्या अर्थव्यवस्थेत आलेल्या तफ़ावतीमुळे कापूस शेतीचा व्यवसाय तोट्याचा झाला आहे. जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे यंदा कापसाला चांगले भाव मिळण्याची शक्यता असूनही जर केंद्र शासनाने निर्यातबंदी लादली तर कापसाचे भाव कोसळणार आहेत. त्याचा प्रतिकार करण्यासाठी आता शेतकरी युवकांनी कंबर कसली पाहीजे.
मेळव्याला युवा आघाडीचे विदर्भाध्यक्ष सम्राट डोंगरदिवे, माजी आमदार सरोज काशीकर, जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, प्रा.मधुकर झोटींग, प्रा.पांडुरंग भालशंकर, जि.प. सदस्य रेखा हरणे यांनी मार्गदर्शन केले.
मेळाव्याचे संचालन सचिन डाफ़े यांनी तर आभारप्रदर्शन दत्ता राऊत यांनी केले.
मेळाव्याच्या यशस्वितेसाठी साहेबराव येडे, उल्हास कोटंबकर, जीवन गुरनुले, संतोष लाखे, शरद सावंकार, पुंडलिक हूडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
* * *

“खबरदार,जर कापूस निर्यातबंदी कराल तर…….!”

“खबरदार,जर कापूस निर्यातबंदी कराल तर…….!”

दि. २ ऑक्टोबरला संपन्न झालेल्या रावेरी येथिल महिला मेळाव्यात शेतकरी संघटनेने दिलेल्या आदेशानुसार वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने वर्धा जिल्हा कचेरीच्या बाजूला म. गांधी पुतळ्यासमोर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत “खबरदार,जर कापूस निर्यातबंदी कराल तर…….!” असा खणखणीत इशारा देण्यात आला. सभेत बोलतांना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे म्हणाले की,या वर्षी अतीवृष्टीमुळे पाकिस्तान व चीन या देशातील कापूस पीक बहूतांशी नष्ट झाले आहे.तसेच अमेरिकेत सुद्धा तिथला कापूस उत्पादक शेतकरी मका व इतर पिकांकडे वळला आहे. भारतात सुद्धा महाराष्ट्र व गुजरातमध्ये अतिपावसामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार आहे त्यामुळे जागतिक बाजारपेठेत कापसाला चांगले भाव मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
परंतू देशांतर्गत कापसाचे भाव पाडण्यासाठी शासनावर मिलमालकांकडून दबाव येत आहे. त्यामुळे केंद्र सरकार निर्यातीवर बंदी आणण्याचे छडयंत्र रचण्याचा प्रयत्न करीत आहे. तो सहन केला जाणार नाही असा इशारा देण्यात आला.
या इशारा आंदोलनाला माजी जिल्हाध्यक्ष निळकंठराव घवघवे,नंदकिशोर काळे,पांडुरंग भालशंकर,जीवन गुरनुले,उल्हास कोटंबकर यांनी संबोधित केले.
या इशारा आंदोलनाला युवक आघाडीप्रमुख सचिन डाफ़े,दत्ता राऊत,डॉ. महाकाळकर,बाबाराव दिवानजी,प्रभाकर झाडे,रामभाऊ तुळणकर,अरविंद बोरकर,रविंद्र खोडे,किसना वरघने,रमेश बोबडे,देविदास मुजबैले,विजय राठी,डॉ. अनिल पोफ़ळे,मंसाराम कोल्हे,दमडू मडावी,सुनिल लुंगसे,धोंडबा गावंडे तसेच सर्व आघाड्यांचे प्रमुख आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.

दत्ता राऊत
प्रसिद्धीप्रमुख.

महिमा कशाचा ?

महिमा कशाचा ? 

कृपया एक गणित सोडवा.
जर शामराव M.Sc, Ph.D , I.A.S असेल तर….

१) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शेतीत वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
२) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता व्यवसायात वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
३) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता रिक्षा चालविण्यात वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
४) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शासकिय नोकरीत वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
५) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता राजकारणात वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.

महिमा कशाचा ? पात्रतेचा की व्यवस्थेचा?

मी पात्रता आणि लायकीबद्दल एवढेच म्हणेन की ज्यांना व्यवस्थेपेक्षा पात्रताच महत्वाची आहे असे वाटते त्यांनी शेती करून आपली पात्रता/लायकी सिद्ध करून दाखवावे. स्वत:चा अनुभव सांगावा,इतरांचा नाही.
वस्तुत: लायकीच्या बळावर या देशात अर्थप्राप्ती होते हे विधानच खोटे आहे.
येथे लायकी नव्हे तर व्यवस्थेला महत्व आहे भाऊसाहेब.

राष्ट्रीय उत्पन्न आणि शेती.

राष्ट्रीय उत्पन्न आणि शेती.

                         १९७० साली भारताच्या समग्र उत्पन्नाच्या ४६% टक्के उत्पन्न शेतीतून येत होते आणि ७०% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून होती. मात्र आज चित्र वेगळे आहे. आता भारताच्या समग्र उत्पन्नाच्या फक्त १६% टक्के उत्पन्न शेतीतून येते पण अजूनही ५५% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून आहे.
१९७० नंतर शेतीची उत्पादकता कमी झालेली नाही या उलट शेतीमधिल एकरी उत्पादन कैकपटींनी वाढले आहे,तरी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न ४६ % टक्क्यावरून चक्क १६ % एवढे खाली उतरलेले दिसते. याचे कारण स्पष्ट  आहे.
                      राष्ट्रीय उत्पन्न उत्पादनाच्या संख्यांकावर किंवा वजनावर नव्हे तर त्या उत्पादनाच्या मुल्यावर काढले जाते.
                     जर वजनाच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्न ठरवले गेले तर याक्षणी सुद्धा देशाच्या उत्पादनाच्या एकुन उत्पादनापैकी शेतीचे उत्पादन हे ९० टक्क्यांपेक्षा जास्त असणार हे उघड आहे.
परंतू येथे मुख्य गोम अशी की
                    औद्योगीक मालाच्या किंमती स्वातंत्र्योत्तर काळात भरमसाठ वाढत गेल्यात मात्र त्यातुलनेने शेतमालाच्या किंमती वाढल्या नाहीत त्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा हिस्सा कमी दिसतो.
त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादकतेशी निगडीत नसून त्या उत्पादनाच्या बाजारभावावर अवलंबून आहे हे आपण लक्षात घेतले पाहीजे

बागायती कापसाचा उत्पादन खर्च

बागायती कापसाचा उत्पादन खर्च
प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप :१५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ६००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
———————————————–
एकूण भांडवली खर्च : ४६००००=००
———————————————–
अ) चालू खर्च..
शेण खत : २५००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १५००० रु.
किटकनाशके : १६००० रु.
संप्रेरके : ३००० रु.
सुक्ष्मखते : १२००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : २४००० रु.
वाहतूक खर्च : ६००० रु.
ओलीत मजुरी : १२००० रु.
वीज बिल : ४००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
———————————————-
एकूण खर्च (अ) : १,४८ ,००० = ००
———————————————-
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४६०००=००
…. चालु गुंतवणुकिवरील व्याज : १००००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४६०००=००
——————————————————————————–
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २५०००० = ००
——————————————————————————–
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ६० quintal.
इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत १८०००० = ००
———————————————————————————
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २,५०,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत १,८०,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,७०,००० = ००
———————————————————————————
.
.
…….. वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,आणि १ विहिर १० एकराचे ओलित होवु शकते असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.

जिरायती कापसाचा उत्पादन खर्च

जिरायती कापसाचा उत्पादन खर्च.
प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप : ००००=००
३) शेती औजारे : २००००=००
४) बैल जोडी : ४००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
———————————————–
एकूण भांडवली खर्च : २,८०,०००=००
———————————————–
अ) चालू खर्च..
शेण खत :००००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १०००० रु.
किटकनाशके : १०००० रु.
संप्रेरके : ०००० रु.
सुक्ष्मखते : ०००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : १२००० रु.
वाहतूक खर्च : ३००० रु.
ओलीत मजुरी : ०००० रु.
वीज बिल : ०००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
———————————————-
एकूण खर्च (अ) : ७६,००० = ००
———————————————-
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : २८,०००=००
…. चालु गुंतवणुकिवरील व्याज : ५,०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : २८,०००=००
——————————————————————————–
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क         १,३७,००० = ००
——————————————————————————–
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ३ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ३० क्विंटल.
इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत ९०,००० = ००
———————————————————————————
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क …….१,३७,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत…..०,९०,००० = ००
ह) शुद्ध तोटा……………………………. ०,४७,००० = ००
———————————————————————————
.
.
…….. वरिलप्रमाणे मी काढलेला जिरायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत
                                            गंगाधर मुटे
—————————————————–
=========================================

खरेच बियाणे वांझ होते … ?

खरेच बियाणे वांझ होते … ?
“भुईला दिली ओल नाही ढगाने
कशी अंकुरावीत आता बियाणे?”
               बीजाची इच्छा आहे अंकुरण्याची, कोंब फ़ुटून वृक्ष बनण्याची,इतर वृक्षाप्रमाणे उंच-उंच वाढून गगनाशी स्पर्धा करण्याची…पण अंकुरण्यासाठी भुईत ओलावा असावा ना? बिना ओलाव्याने अंकुरायचे तरी कसे? अंकुरायला पाणीच हवे, कोणाचा कोरडा सल्ला किंवा अगम्य आशावाद किंवा प्रचंड मनोबळ असून-नसून उपयोग तो काय? ओलावा मिळाला तरच इच्छाशक्ती,आशावाद,मनोबळ उपयोगाचे. नाही तर शुन्य उपयोगिता.
              भुईला पण वाटते की त्या बीजाचा जन्म व्हावा. मातृत्वाची प्रेरणा काय असते,हे त्या मातेलाच कळे. पण ती तरी काय करणार बिचारी? ओलाव्यासाठी ती पुर्णत: मेघावर अवलंबून. मेघाकडून तिला पाण्याचे थेंबच हवे. कोरडे गर्जन नकोच. कोरड्या गर्जनाचा आवाज फ़ार मोठा. अशा गर्जनांमुळे गर्जना केल्याचा मेघाला आनंद मिळेलही कदाचित. पण अशा गर्जनांचा भुईने आणि बीजाने उपयोग तरी काय करून घ्यावा?
             बीजाला उगवता आले नाही कारण मातीत ओलावा नव्हता. आणि मातीत ओलावा तयार होण्यात न होण्यात बीजाचा दोष तो काय?
            पाऊस पाडला नाही हा दोष मेघांचा. दोष मात्र मढला जातो बीजाच्या माथ्यावर.
मेघांना दोषी ठरविण्यासाठी लागणारी हिंमत ज्यांच्याकडे नाही ते चक्क बियाणेच वांझ होते असा शेरा मारून मोकळे होतात.
गंगाधर मुटे
………………………………………………………………..

शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे

शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे

                   आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी मानसोपचार शिबिरे आयोजित करावी, असा वारंवार सल्ला दिला जातो त्या अनुषंगाने खालील बाबींचा विचारवंताकडून खुलासा होणे आवश्यक आहे.

१) जेंव्हा जेंव्हा शेतकरी आत्महत्येचा विषय निघतो तेंव्हा तेंव्हा शेतकरी मनोदुर्बलता किंवा मनोरुग्णतेमुळे आत्महत्या करतो असेच निदान केले जाते. आणि त्याच अनुषंगाने उपाययोजना सुचविल्या जातात. सहाजीकच, निदान जर चुकीचे असेल तर सुचविलेले उपाय योग्य कसे असणार? (वाचा – शेतकरी आत्महत्यावर तज्ज्ञांची मुक्ताफळे – )

२) आर्ट ऑफ लिविंग किंवा मानसोपचार शिबिरे आयोजित करायला हरकत नाही पण शेतकर्‍यांचे मनोबळ वाढावे यासाठी काय सांगणार? प्रबोधनाचे स्वरूप काय असणार?
उदा. शेतकरी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या करत असेल तर त्याचे मनोबळ वाढविण्यासाठी

अ) कर्ज परत करण्यासाठी चोरी करा, दरोडे घाला आणि पैसे मिळवून कर्ज परत करा असे सांगणार? (शेतीच्या उत्पन्नातून/बचतीतून त्याला कर्ज फ़ेड करता आली नाही हे गृहीत धरावेच लागेल.)

आ) मरण पत्करण्यापेक्षा कर्ज बुडवायला शिकण्याचा सल्ला देणार?

इ) आर्थीक हलाखीमुळे मुलीचे लग्न करता येत नसेल तर टेंशन घेऊ नकोस, ती बिनालग्नाची राहीली तरी चालेल पण तू जगलाच पाहीजे असे सांगणार?

ई) सावकाराने कर्जापायी भरचौकात अपमान केला तरी तू मनाला लावून घेऊ नकोस, संवेदनाक्षम, हळवेपणाने जगण्यापेक्षा कोडगेपणाने वाग असा सल्ला देणार?

            मानसोपचार शिबिरे घेणार म्हणजे त्याला काय समजावणार याचा उलगडा व्हायला हवा.
रोगाचे निदानच चुकीचे घेवून एखादा मानसोपचारतज्ज्ञ उपचार करणार असेल तर अपेक्षित परीणाम कसा साधला जाईल?
हे प्रश्न अनुत्तरीत राहातात.
………………………………………………………
या अनुषंगाने झालेली एक प्रश्न-उत्तरांची देवानघेवान.


शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर पुष्कळ चर्वितचर्वण  झाले आहे.
(आणि त्या सर्वांच्या मते शेतकरी मुर्ख, मनोरुग्न व अज्ञानी आहे.)


 कित्येकदा तर मूळ विषयाचे गांभीर्य दडपून टाकून, केवळ सरकारवर तोफा डागण्यासाठी हा विषय ‘हायजॅक’ केला गेला आहे.
(हे ‘हायजॅक’ करणारे मात्र नक्कीच मनोरुग्न असणार. पाठवा त्यांना मेंटल हॉस्पीटल मध्ये. माझे सक्रिय समर्थन.)


मुंबईतल्या किंवा कुठल्याही झोपडपट्टीमधले, उकिरड्यातले अन्न वेचून खाणारे, रेल्वे रुळांवर शौचास जावे लागत असलेले, दिवसोंदिवस आंघोळ करू न शकणारे लोक आत्महत्या का करीत नाहीत? 
(ते सात पिढ्यांत फेडता येणार नाही एवढे कर्जबाजारी नाहीत म्हणून.)


त्यांच्यामध्ये जगण्याची कोणती प्रेरणा असते?
(सर्व सजीवांमध्ये जगण्याची  प्रेरणा सारखीच असते.)


 किंवा, उलटपक्षी, कॅट सारख्या परीक्षांतील अथवा कुठल्याही परीक्षेतील अपयशाला घाबरणारे, आय. आय. टी सारख्या नामवंत शिक्षणसंस्थांतून शिकणारे लोक आत्महत्या का करतात? त्यांच्यामध्ये कोणती प्रेरणा कमी पडते? महत्त्वाच्या परीक्षांच्या निकालांच्या आगेमागे आत्महत्यांची लाट का येते?  रोज रात्री नवर्‍याच्या लाथाबुक्क्यांचा मार खाऊन, प्रसंगी डाग, चटके सोसून पुन्हा सकाळी निमूटपणे सर्व अपमान व सर्वांसमोर झालेली शोभा विसरून(सूडाची भावना न ठेवता) त्याच्यासाठी स्वयंपाक बनवणारी स्त्री कोणत्या अंतःप्रेरणेने जगत असते? त्यातल्या काही आत्महत्या करतातही, पण एकंदर अत्याचाराच्या प्रमाणात त्या नगण्य असतात.
(आत्महत्येस एवढेच कारण पुरेसे नाही.)


शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा देशातल्या एकूण आत्महत्यांमधला एक छोटा भाग आहे.
(किती शेतकर्‍यांनी पुन्हा आत्महत्या कराव्यात म्हणजे आंकडा शोभून दिसेल ????????.
सबंध देशात फक्त एका शेतकर्‍याने जरी आत्महत्या केली तरी एखाद्याला ते लाजीरवाने वाटेल. याउलट आत्महत्या करता करता एखादी पिढी जरी उध्वस्त झाली तरी एखाद्याला त्याचे काहीच वाटणार नाही. हे समिकरण शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या संख्येवर नव्हे तर त्या “एखाद्याची” मानसिक रचना/ठेवन कशी आहे यावर अवलंबून आहे. )


 त्यातूनही, सर्वच कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतात का?  
(“सर्वच कर्जबाजारी शेतकर्‍यांनी आता सामुहीक आत्महत्या करून  तसे सिद्ध करून दाखवावे, तसे न केल्यास आत्महत्या करणार्‍याला आम्ही मनोरूग्न म्हणत राहू, इतर कुठल्याही कसोट्यांवर पडताळा करण्याची गरज नाही” असा याचा अर्थ घ्यायचा काय? )


जर ह्याचे उत्तर ‘नाही’ असे असेल, तर आत्महत्यांमागे मनोदुर्बलता हे कारण असण्याची शक्यता वाढते.


(मग सरकार झोपी गेले काय? अशा मनोरूग्न शेतकर्‍यांची तातडीने राज्यवार यादी बनवा आणि प्रसिद्दीला द्या. म्हणजे अशा मनोरूग्न शेतकर्‍यापासून इतर शेतकरी बांधव सुरक्षीत अंतर ठेवून चालतील.)


गंगाधर मुटे
………………………………………………………………..

सहज करता येण्याजोगे शेती-उद्योग

सहज करता येण्याजोगे शेती-उद्योग.

                 बदलत्या काळानुसार शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लागला आहे. नत्र,स्फ़ुरद, पालाश या मुख्य खतांसोबतच सुक्ष्मखतांचा (Micro nutrient fertilizers) वापर वाढला आहे. पैकी नत्र,स्फ़ुरद,पालाश या मुख्य खतांची निर्मीतीसाठी प्रचंड गुंतवणुकीचे कारखाने लागतात.

परंतू सुक्ष्मखतांची (Micro nutrient fertilizers) निर्मीती किंवा प्रक्रिया-पॆकिंग करून विपनन करणे हा उद्योग/व्यवसाय म्हणुन अत्यंत चांगला पर्याय ठरू शकतो.
या अनुषंगाने इच्छूकांना मदत व्हावी या उद्देशाने येथे काही कृषीसंबधित करता येण्याजोग्या उद्योगांची एक यादी बनविण्याचा प्रयत्न करित आहे.


१) सुक्ष्मखते (Micro nutrient fertilizers)
पिकांच्या जोमदार वाढीसाठी १६ मुलद्रव्यांची (elements) आवश्यकता असते. त्यापैकी Fe, Zn, Mn, Cu, B, Mo, Cl हे प्रमुख मुलघटक असुन यांच्या एकापेक्षा अधिक मुलघटकांच्या योग्य त्या प्रमाणात मिश्रणाला सुक्ष्मखते म्हणतात. सध्या या सुक्ष्मखंतांना प्रचंड मागणी आहे.
मुलद्रव्यांची (elements) नांवे खालील प्रमाणे.
1) Copper sulphate (CuSO4.5H2O)
2) Zinc sulphate (ZnSO4.7H2O)
3) Borax or Sod.Borate (Na2B4O7.10 H2O)
4) Manganese Sulphate (MnSO4.4H2O)
5) Ammonium Molybdate ( (NH4)6Mo7O24.4H2O)
6) Ferrous sulphate (FeSO4.7H2O)
7) Magnesium sulfate (or magnesium sulphate)
………………………………………………………………………
२) जैविक खते (Bio-fertilizers)
A. Nitrogen fixers
Symbiotic: – Rhizobium, inoculants for legumes.
Non-symbiotic: – For cereals, millets, and vegetables.
a) Bacteria:-
i). Aerobic:-Azatobacter, Azomonas, Azospirillum.
ii) Anaerobic:- Closteridium, chlorobium
iii) Facultative anaerobes- Bacillus, Eisherichia
b) Blue green algae- Anabaena, Anabaenopsis, Nostoe
A. Phosphate solubilizing micro-organisms.
B. Cellulolytic and lignolytic micro-organisms.
C. Sulphur dissolving bacteria.
D. Azolla.
………………………………………………………………………….
३) संप्रेरके – फ़वारणीच्या माध्यमातुन वापर केला जातो.
पिकांची कायीक वाढ, फ़ळांची गुणवत्तासुधारणा, पिकांचा कालावधी
कमि-जास्त करणे वा तत्सम कारणासाठी संप्रेरके वापरली जातात.
सध्या वापरात असलेली काही मुख्य संप्रेरके.
१) आमिनो अ‍ॅसिड – Amino Acid.
२) जिबरेलिक अ‍ॅसिड – Gibberellic acid (also called Gibberellin A3, GA, and (GA3)
३) नॆपथ्यालिक अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड – NAA
४) ह्युमिक ऎसिड – Humic acid – Fulvic acid organic plant food and root growth promoters
……………………………………………………………………………
१) या उद्योगांसाठी जिल्हा उद्योग केंद्र,खादी-ग्रामोद्योग वा इतर शासकिय विभागांकडून बिजभांडवल स्वरूपात अर्थसाहाय्य होऊ शकते.
२) वर उल्लेखिलेले बहुतांश उद्योग २५ लाखाचे आंत असल्याने पंतप्रधान रोजगार योजनेंतर्गत सबसिडी मिळण्यास पात्र आहेत.
वरिल सर्व उत्पादनांना चांगली मागणी असून मालाची गुणवत्ता व मार्केटिंग
कौशल्य या दोन बाबींच्या आधारावर सहज यशप्राप्ती होऊ शकते.
.शुभेच्छासह.
.
गंगाधर मुटे.

———————————————————————————————
div dir=”ltr” style=”text-align: left;” trbidi=”on”>

०३-०७-२०१३

टीप : शेतीविषयक सल्ला विचारणारे अनेक प्रश्न या लेखावर वाचकांकडून प्रतिसादामार्फ़त उपस्थित केले जातात. त्या सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी माझ्याकडे काहीही यंत्रणा नसल्याने मी कुणालाच फ़ारशी व्यक्तिगत मदत करू शकत नाही.

यावर पर्याय म्हणून मी http://www.baliraja.com/ या साईटवर काही पर्यायी व्यवस्था उभारायचा प्रयत्न केला परंतू अजूनपर्यंत तरी मला यश आलेले नाही.
त्यामुळे सल्ला अथवा मदतीची अपेक्षा असलेले प्रश्न प्रतिसादातून विचारले जावू नयेत. ही विनंती.